सिटी टाइम्स ऑनलाईन लाखनी | आरोग्य सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेत होत असला तरी शासनाच्या पर्यायाने जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षित धोरणामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहचली नसल्याचा प्रत्येय मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्रात आला.
हेही वाचा | सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम निम्न प्रतीचे
कर्मचाऱ्यांच्या मंजूर २४ पदापैकी आरोग्य सेविका ५, आरोग्य सेवक ४, कुष्ठरोग तंत्रज्ञ १, परिचर ३, वाहन चालक १ अशी १४ पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य ती आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे ऑक्सीजन वर असल्याच्या चर्चा होत आहेत.
लाखनी तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व चुलबंद नदी खोरे तथा वन व्याप्त , अविकसित भूप्रदेश अशी ख्याती प्राप्त मुरमाडी/तूप परिसरात दारिद्र्य रेषेखालील , अल्प-अत्यल्प शेतकरी तथा भूमिहीन शेतमजूर कुटुंबांची संख्या अधिक असल्याने मागास प्रदेश म्हणून ओळख आहे. या कुटुंबांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली.
हेही वाचा | लाखनी येथे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार समारंभ
मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात २ आयुर्वेदिक दवाखाने, ६ आरोग्य उपकेंद्र आणि २९ गावे समाविष्ट असून ३२ हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे देण्यात आली असली तरी रिक्त कर्मचाऱ्यांच्या पदांमुळे पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सेवा दिली जात नाही.
असे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे म्हणणे आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची २४ पदे मंजूर असली तरी आरोग्य सेविका ५, आरोग्य सेवक पुरुष ४, कुष्ठरोग तंत्रज्ञ १, परिचर ३, वाहन चालक १ अशी एकूण १४ पदे रिक्त आहेत.
त्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत असल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. इच्छा असूनही योग्य ती आरोग्य सेवा मात्र देता येत नसल्याचे दिसते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरून आरोग्य सेवा सुरळीत करावी. अशी मागणी होत आहे.
उपकेंद्रांची परिस्थिती गंभीर
मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ६ उपकेंद्र येत असले तरी मरेगाव, कोलारी, खराशी, दिघोरी ह्या ४ उपकेंद्रात तसेच आरोग्य सेविकेचे पद रिक्त असल्यामुळे स्तनदा व गरोदर माता तसेच अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आरोग्य सेविकेची पदे भरणे आवश्यक आहे.
आरोग्य सेवकांचीही कमतरता
सध्या पावसाळ्याचे दिवस असून अस्वच्छता किंवा साचलेल्या पाण्यामुळे डास निर्मिती होऊन डेंग्यू, मलेरिया या सारखे आजार पसरण्याची शक्यता असली तरी रक्ताचे नमुने घेणारे आरोग्य सेवक दिघोरी, कोलारी, पालांदूर, मरेगाव या ठिकाणी नसल्यामुळे अडचणीचे ठरत आहे.